नाशिक : खतानी भरलेला ट्रक शेतात खाली करण्यासाठी निघालेल्या ट्रकला लोंबणाऱ्या वीजेच्या तारांचा धक्का लागला.
त्यामध्ये ड्रायव्हर आणि क्लिनर दोघेही जागीच ठार झाले आहेत. ही घटना निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत जवळील पालखेड ते डावसवाडी शिव रस्त्यावर घडली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरणकडे तक्रार करून देखील लोंबणाऱ्या विजेच्या तारांचा व्यवस्थित बंदोबस्त न केल्यामुळे सदर घटना घडली आहे. अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे, तरी या शिवरस्त्यालगत अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबत असून आता तरी महावितरणाने या तारावर घ्याव्या अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थ करीत आहे.
त्याकडं दुर्लक्ष केल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली
महावितरण कार्यालयात ग्रामस्थांनी वीजेच्या तारा खाली आल्याची तक्रार दिली होती. पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्याकडं दुर्लक्ष केल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. त्याचवेळी तारांचा बंदोबस्त केला असता, तर आज दोन माणसांचा मृत्यू झाला नसता.
तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली होती
ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. त्यानंतर तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली होती. ही घटना पोलिसांना आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. वीज बंद केल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली.
नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या शेतीची कामं सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग कामात व्यस्त आहे. अवकाळी पाऊस सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या कामात खोळंबा झाला आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसामुळे शेतीचं अधिक नुकसान झालं आहे.



