सोलापूर : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आला आहे.
दोन वर्षापासून सुरु असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या मृत्यूने झाला आहे. दोघांमधलं प्रेमप्रकरण संपुष्टात आलं होतं. मात्र त्यानंतरही प्रियकर विवाहित प्रेयसीची पाठ सोडत नव्हता. त्यामुळे प्रेयसीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.
जुना विडी घरकुल येथे राहणाऱ्या कविता कल्याणम विवाहितेने प्रियकराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कविता कल्याणम हिचे तिच्याच जवळपास राहणाऱ्या संदीप राठोड याच्याशी प्रेमसूत जुळले होते. मात्र सदरची बाब कविता कल्याणम हिच्या पतीला कळल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला समज देत अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती. त्यानंतर दोघातील प्रेम प्रकरण संपुष्टात आले होते. मात्र प्रियकर संदीप राठोड हा मयत कविता कल्याणम हिची पाठ सोडत नव्हता.
संदीप राठोड वारंवार कविता कल्याणमला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून कविता कल्याणम हिने टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरातमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान याबाबत कल्याणम यांचे नातेवाईक, शेजारी तसेच रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपीला अटक करावी अशी मागणी देखील केली आहे.
“सोमवारी सकाळी साडेसहा वाजता घरासमोर राहणाऱ्या कविता कल्याणम हिने फाशी घेतल्याचे आढळून आले. काल सकाळच्या घटनेनंतरचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या महिलेचा पती तमिळनाडू येथे होते. नातेवाईकांनी माझ्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी फोन करुन पोलिसांकडून या घटनेची माहिती घेतली. नातेवाईकांसोबत पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. त्यांना न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे,” असे रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले म्हणाले.



