सांगोला तालुक्यातील एका दाम्पत्याने मुल होत नसल्याने भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिर परिसरातून चिमुकल्याचे अपहरण केले.
मात्र, पोलिसांनी 48 तासांत अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन चिमुकल्याची सुटका केल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
मोहन अंबादास शितोळे (वय 50) आणि छाया मोहन शितोळे (वय 30, दोघे रा. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सुषमा राहुल नाईकनवरे (रा. शिवाजीनगर, ता. खंडाळा, जि. सातारा) या शुक्रवारी (दि. 3) त्यांच्या सहावर्षीय मुलासह आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या.
देवदर्शनानंतर त्या मुलासह भक्तनिवासात थांबल्या होत्या. सकाळी साडेआठच्या सुमारास मुलाचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच नाईकनवरे यांनी भुदरगड पोलिसांत तक्रार दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा गतिमान केली. आदमापूर येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा माग काढण्यात आला.
अपहरणकर्ते संशयित दाम्पत्य मुलाला घेऊन निपाणी, चिक्कोडी, अंकली, मायाक्का चिंचणीमार्गे मिरजकडे गेल्याचे तपासात लक्षात आले. त्यावरून पोलीस सोलापूर जिह्यातील जावळा येथील मोहन शितोळे या संशयिताच्या घरी पोहोचले.
मुलाची सुखरूप सुटका करून शितोळे दाम्पत्याला अटक केली. स्वतःला मूल होत नसल्यानेच भक्तनिवासातून मुलाला सोबत आणल्याची कबुली संशयित शितोळे दाम्पत्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक राजीव नवले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आदी यावेळी उपस्थित होते.



