सातारा जिल्ह्यातील वेळे या ठिकाणी दुचाकीचा अपघात होऊन दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वेळे गावातून गुळुंब गावाकडे जाणार्या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे.
सध्या वेळे गावच्या स्मशानभूमीलगत असलेल्या ओढ्यावरील पुलाचे नवीन काम सुरू आहे. या कामासाठी लावलेल्या पत्र्यावर दुचाकी धडकल्यामुळे भीषण अपघात होऊन दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
प्रमोद गंगाराम यादव (वय 20, रा. यशवंतनगर वाई) व प्रथमेश संतोष खैरे (वय 21, रा. ब्राम्हणशाही वाई) अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेजण दुचाकीवरून बुधवारी रात्री 8 च्या दरम्यान गुळुंबकडे निघाले होते. यादरम्यान ते वेळे येथील स्मशानभूमीजवळील पुलाजवळ आले. त्या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्यामुळे पुलाच्या बांधकामाला पत्रे लावण्यात आले होते. रात्रीच्या अंधारात या दोघांना ते पत्रे न दिसल्यामुळे त्यांची दुचाकी पत्र्यांना धडकून समोरील भिंतीवर जाऊन आदळली. आणि दुचाकीवरील प्रमोद व प्रथमेश हे जवळच्या ओढ्यात जाऊन पडले.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी तातडीने जखमी प्रमोद व प्रथमेश यांना पाण्यातून बाहेर काढले व कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच पेट्रोलिंगवर असणारे सपोनि रमेश गर्जे
व पीएसआय रत्नदीप भंडारे
घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले
मात्र त्या अगोदरच प्रमोद व प्रथमेश यांचा मृत्यू झाला होता. भुईंज पोलिस ठाण्यात
या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी वेळे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.



