👁 4 Views

वर्धा: शहीद पतीचे स्वप्न पत्नीने केले पूर्ण , बिकट परिस्थितीतून मुलाला बनविले ‘ लेफ्टनंट,

 वर्धा : कारगील युध्दात आघाडीवर लढणारे पुलगाव येथील कृष्णाजी समरीत हे शहीद झाले होते. त्यावेळी त्यांचे पार्थीव पुलगावला आले असतांना सामान्यांचेही डोळे पाणावले हाेते.


तर समरीत कुटुंबात अश्रुचा बांधच फुटला. शहीद कृष्णाजी यांची गर्भवती पत्नी व दोन वर्षाचा मुलगा यांचा आधारच गेला होता. पोटातील बाळ व हात धरून चालणारा चिमुरडा यांना सांभाळून सविताताई यांना पुढील वाटचाल करायची होती.

घरात आधार व उत्पन्नाचा स्त्रोत नाही. काळाशी झुंज करीत मुलांना मोठे करायचे होते. घरी असतांना कृष्णा समरीत हे मोठ्या मुलाकडे पाहून म्हणायचे,’बाळा, तुला सैन्यात अधिकारी व्हायचेय’. शहीद पतीची ईच्छा पूर्ण करायचीच असा चंग बांधून सविताताई यांनी मुलांना चांगले शिक्षण देण्याचा व व्यवस्थित संगोपण करण्याचा मानस ठेवला. मोठा कुणाल याने मात्र अभियांत्रिकी शिक्षणात आवड असल्याने त्यात पदवी घेतली. आता एमटेक होवून तो पुण्यात कार्यरत आहे. तर धाकटा प्रज्वल याने पुलगावच्याच केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेतले. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचा त्याला ध्यास होता.


सैन्यदलाच्या परीक्षेची त्याने कसून तयारी केली. अखेर त्याला यश मिळाले. अखिल भारतीय स्तरावर तो ६३व्या रॅकवर आला आहे. लेफ्टनंट म्हणून त्याची निवड झाली. अनेक वर्षानंतर समरीत कुटुंबाचे घर आनंदाने उजळून निघाले. पुण्यात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर १८ महिण्याच्या प्रशिक्षणासाठी तो डेहराडूनला जाणार आहे. निवृत्ती वेतनावर या कुटुंबाची वाटचाल झाली. पतीच्या निधनापश्चात मिळालेल्या पैश्यातून सविताताईंनी प्लॉट घेवून घर बांधले. कुटुंबास हक्काचा निवारा मिळाला. त्या म्हणतात की मुलास सैन्याधिकारी करण्याचे पतीचे स्वप्न पूर्ण करता आल्याने आयुष्याचे सार्थक झाल्याची भावना आहे. सुरूवातीला माहेरच्या मंडळीची साथ मिळाली. मूलं शिकून मोठी झाली. तसेच वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत मुलगा देशाच्या संरक्षणासाठी सिध्द झाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *